धरोनि दोन्ही रूपें पाळणें संहार – सार्थ तुकाराम गाथा 1574

धरोनि दोन्ही रूपें पाळणें संहार – सार्थ तुकाराम गाथा 1574

धरोनि दोन्ही रूपें पाळणें संहार । करी कोप रुद्र दयाळ विष्णु ॥१॥
जटाजूट एका मुगुट माथां शिरीं । कमळापति गौरीहर एक ॥ध्रु.॥
भस्मउद्धळण लक्ष्मीचा भोग । शंकर श्रीरंग उभयरूपीं ॥२॥
वैजयंती माळा वासुगीचा हार । लेणें अळंकार हरीहरा ॥३॥
कपाळ झोळी एका स्मशानींचा वास । एक जगन्निवास विश्वंभर ॥४॥
तुका म्हणे मज उभयरूपीं एक । सारोनि संकल्प शरण आलों ॥५॥

अर्थ

जगाचे पालन आणि संहार करण्याकरता पांडूरंगानेच दोन रुप धारण केले आहे ते म्हणजे भगवान शंकर आणि भगवान विष्णू भगवान शंकर कोप धरुन संहार करतात तर भगवान विष्णू दयाळूपणाने पालन करतात. एकाच्या डोक्यावर जटा आहे तर एकाच्या डोक्यावर मुकूट आहे एक पार्वतीचा पती आहे तर एक कमळापती म्हणजे लक्ष्मीचा पती आहे. एकाने अंगाला भस्म लावला तर एक लक्ष्मीचा भोग घेत आहे याप्रमाणे भगवान शंकर आणि भगवान श्रीरंग विष्णू हे उभयरुपाने एकच आहेत. एकाच्या गळयात वैजयंती माळ आहे तर एकाच्या गळयात वासुकी दर्पाचा हार आहे. अशा प्रकारे हरी आणि हर यांचे अलंकार आहेत. भगवान शंकराच्या एका हातात नरकपाळ आहे काखेत झोळी आहे आणि ते स्मशानात वास करतात आणि विश्वंभर भगवान विष्णू सर्व जगतामध्ये निवास करतात. तुकाराम महाराज म्हणतात, “भगवान शंकर आणि भगवान विष्णू ही दोघेही एकरुपच आहेत आणि मी सर्व प्रकारचे संकल्पे बाजूला सारुन त्यांना शरण आलो आहे.”


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.