लटिकें तें ज्ञान लटिकें ते ध्यान – सार्थ तुकाराम गाथा 1561

लटिकें तें ज्ञान लटिकें ते ध्यान – सार्थ तुकाराम गाथा 1561

लटिकें तें ज्ञान लटिकें ते ध्यान । जरि हरीकिर्तन प्रिय नाहीं ॥१॥
लटिकाचि दंभ घातला दुकान । चाळविलें जन पोटासाठी ॥ध्रु.॥
लटिकेचि केलें वेदपारायण । जरि नाहीं स्फुंदन प्रेम कथे ॥२॥
लटिकें तें तप लटिका तो जप । अळस निद्रा झोप कथाकाळीं ॥३॥
नाम नावडे तो करील बाहेरीं । नाहीं त्याची खरी चित्तशुद्धि ॥४॥
तुका म्हणे ऐसीं गर्जती पुराणें । शिष्टांची वचनें मागिलाही ॥५॥

अर्थ

एखाद्या मनुष्याला हरिकीर्तनच प्रिय नसेल आणि त्याने कितीही ज्ञान संपादन केलेलो असेल, त्याने कितीही ध्यान केलेले असो ते सर्व लटिके म्हणजे खोटे आहे. अशा प्रकारचे दांभिक लोक स्वतःचे पोट भरण्याकरता पारमार्थिक दुकान टाकतात आणि लोकांची फसवणूक करतात. अशा मनुष्याने हरिकथा करत असताना त्याच्या हृदयात जर अष्टसात्विक भाव उत्पन्न होत नसेल तर त्याने कितीही वेद पारायण केले तरी ते व्यर्थच आहे. ज्या मनुष्याला कथेच्या वेळी आळस, निद्रा, झोप येते मनुष्याने कितीही जप-तप असो ते सर्व खोटे आहे. ज्याला हरीचे नाम आवडत नाही, ज्याची खरोखरच चित्तशुद्धी झालेली नाही त्याने आपल्या पारमार्थिकाचे वाटोळे केले आहे असेच जाणावे. तुकाराम महाराज म्हणतात मी जे काही सांगतो आहे ते पुराने देखील गर्जून सांगतात आणि मागे झालेले श्रेष्ठ संत देखील हेच सांगतात.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.