पवित्र तो देह वाणी – संत तुकाराम अभंग – 1049

पवित्र तो देह वाणी – संत तुकाराम अभंग – 1049


पवित्र तो देह वाणी पुण्यवंत । जो वदे अच्युत सर्व काळ ॥१॥
तयाच्या चिंतनें तरतील दोषी । जळतील रासी पातकाच्या ॥ध्रु.॥
देव इच्छी रज चरणींची माती । धांवत चालती मागें मागें ॥२॥
काय त्यां उरलें वेगळें आणीक । वैकुंठनायक जयां कंठीं ॥३॥
तुका म्हणे देवभक्तंचा संगम । तेथें ओघ नाम त्रिवेणीचा ॥४॥

अर्थ

जो सर्वकाळ अच्युता चे नाम आपल्या वाणीने घेतो त्याचा देह पवित्र आहे आणि वाणी पुण्यवंत आहे .आणि त्याचे सतत नाम घेणाऱ्या वैष्णवांचे स्मरण जरी केले तरी कितीही दोष असले तरी त्यांचा नाश होतो .आणि तो मनुष्य हा भवसमुद्र तरुन जातो व त्याच्या सर्व पापांच्या राशी जळून जातात. देव सुद्धा त्या पवित्र वैष्णवांच्या पायाची रज म्हणजे माती आपल्याला मिळावी यासाठी प्रयत्न करतो व त्याच्या मागे मागे सारखा फिरत असतो .त्या वैष्णवांच्या कंठामध्ये सदासर्वकाळ वैकुंठ नायकाचे नाम आहे व मग वैष्णवांच्या मध्ये आणि देवा मध्ये कोणता फरक उरला आहे. तुकाराम महाराज म्हणतात गंगा आणि यमुना यांचा संगम झाला की तेथे सरस्वती गुप्त रूपाने असते तसेच देव आणि भक्त यांचा संगम झाला की तेथे नामरूपी त्रिवेणी संगम आपोआप तयार होतो.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

पवित्र तो देह वाणी – संत तुकाराम अभंग – 1049

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.