महती संताची

संत जनाबाई माहिती

संत जनाबाई

जन्म अंदाजे इ.स. १२५८
गंगाखेड
मृत्यू अंदाजे इ.स. १३५०
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा वैद्यकीय
वडील दमा
आई करुंड

उत्कट भक्तीभावाची साक्ष देणार्‍या भक्त जनाबाई

उत्कट भक्तीभावाची साक्ष देणार्‍या भक्त जनाबाई आणि साक्षात् विठ्ठल यांच्या संवादाची हीच ती खोली ! भक्त जनाबाईंवर विठ्ठल पांघरत असलेली घोंगडी चित्रात दर्शविली आहे.

भक्त जनीसाठी साक्षात् विठ्ठल प्रकट होऊन तिच्यासाठी दळण दळत असे. हेच ते जातं !

अभंगांना खडीसाखरेची गोडी

शेकडो वर्षे महाराष्ट्राच्या मुखात दोन संतांचे अंभंग खडीसाखरेप्रमाणे घोळतायत. आणि ते म्हणजे संत तुकोबाराय आणि संत जनाबाईंचे गोड अभंग.पंढरीची सावळी विठाई म्हणजे दीनदुबळ्यांची आई. सुखदु:ख जाणून घेणारी माऊली. अनाथ जनी असा या विठाईच्या नावाने टाहो फोडते. या विठाईची वाट पाहून जनाई व्याकूळ होते.पांडुरंगाच्या देवळासमोरच झोपडीत राहणार्‍या गरीब जनाबाईने देवाच्या गळ्यातले पदक चोरले, असा आरोप तिच्यावर होतो. मग आपण सोन्यानाण्याची नव्हे तर विठुरायाची चोरी केली आणि त्याला हृदयात बंदिस्त केल्याचे ‘धरिला पंढरीचा चोर’ या अभंगातून ती सांगते. ‘माझे अचडे बचडे छकुडे गं राधे रुपडे’ सारखे तिचे श्री विठ्ठलाच्या बाळरुपाचे वात्सल्याने ओतप्रोत भरलेले अभंग तर अप्रतिम ठरलेत. 

जनीची भक्ती म्हणजे रोजचं काम करता करता देवाचं नाव घेणं. ‘दळीता कांडिता तुज गाईन अनंता’ हे तिचं तत्वज्ञान खेडोपाड्यातील अडाणी माणसांनाही आपलं वाटतं आहे. जनीनं दाखवलेला‘लेकुरवाळा विठूराया’संसारात रमलेल्या, मुलंबाळं सांभाळणा-या आयाबायांना नेहमीच भावलेला आहे.‘नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे’ हा जनाबाईचा अभंग गात वारकरी पंढरीची वाट चालतात.

बालपण

परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावरील गंगाखेड हे जनाबाईंचे गाव होय. तिच्या वडिलांनी जनाबाईंला नामदेवांचे वडील दामाशेट शिंपी यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले. तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबीयांतील एक घटक बनल्या. त्या स्वतःला नामयाची दासी म्हणवून घेत असत.

जीवन

जनाबाईंचा जन्म परभणी येथील गंगाखेड येथील दमा नावाच्या विठ्ठलभक्ताच्या घरी झाला. जनाबाईंच्या एका अभंगातील “माझ्या वडिलांचे दैवत| तो हा पंढरीनाथ ||” या ओळींवरून त्यांचे वडील दमा हेदेखील वारकरीअसावेत, अशी शक्यता दिसते. त्यांच्या आईचे नाव करुंड. त्याही भगवद्भक्त होत्या. संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना, कांडताना त्यांच्या ओव्या गातात.

संत जनाबाई यांनी याच चुलीवर भाकर्‍या करून विठ्ठलाला जेवू घातले होते. या भक्तीरसपूर्ण संबंधांची ग्वाही देणार्‍या या चुलीला भावपूर्ण नमस्कार करूया

जनाबाईच्या पाऊलखुणा

अतिशय सामान्यातली सामान्य, अशी जनाबाईची ओळख. पण आयुष्यभर मोलकरणीचं काम करणार्‍या या दासीनं एक असामान्य काम केलं. ते म्हणजे, तिनं काळजाचा ठाव घेणारे अभंग लिहिले. आणि मराठवाड्यातल्या गंगाखेडची जनी संत जनाबाई बनली.तत्कालीन खालच्या सामाजिक स्तरातून वर उठून स्वतःचं असं वेगळं अस्तित्व निर्माण करणार्‍या संत अशी जनाबाईची ओळख. अत्यंत सामान्य जीवनातून अलौकिक अशी यशाची झेप घेणार्‍या जनाबाईचा जन्म परभणी जिल्ह्यातल्या गोदातीरी असलेल्या गंगाखेडमध्ये झाला. दमा आणि करुंड अशी त्यांच्या आईवडिलांची नावं. हे दोघंही पंढरपूरच्या विठूरायाचे निस्सीम भक्त होते. दोघंही पंढरीची वारी न चुकता करत. जनाबाईंच्या वडिलांनी तिला संत नामदेव यांचे वडिल दामाशेटी यांच्या पदरात टाकलं. तेव्हापासून त्या नामदेव यांच्या कुटुंबाच्या एक घटक बनल्या.

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरासमोर त्यांचा वाडा असल्यामुळे जनाबाईला विठूरायाचं दर्शन रोज घडायचं. त्यातच नामदेवांच्या घरी विठूभक्तीचा सातत्यानं गजर होत असल्यानं त्यांच्या जीवनात पंढरपूर, पंढरीनाथ आणि नामदेव यांना विशेष स्थान होतं. नामदेवांच्या सहवासात त्यांनी पांडुरंगाच्या भक्तीचा ध्यास घेतला. ते जनाबाईचे पारमार्थिक गुरु बनले.  त्यामुळेच त्यांना नामयाची दासी म्हणूनही ओळखलं जातं.
जनाबाईच्या मनातील श्रेष्ठ गुरूभाव ही तिची शक्ती होती. आयुष्यभर नामदेवांच्या भक्तीमार्गाच्या पाऊलखुणांवरून प्रवास करणारी जनाबाई अखेरच्या क्षणीदेखील गुरूची सावली बनून राहिली. इ. स. १३५० मध्ये आषाढ महिन्यात, कृष्ण पक्षात त्रयोदशीच्या मुहूर्तावर नामदेवांनी देह ठेवला. संत जनाबाई देखील त्याच वेळी नामयाच्या पायरीवर विसावून पांडुरंगात विलीन झाली.अभंग, गवळणी, ओव्यांच्या रुपात अजूनही संत जनाबाई खेडोपाड्यांतील घराघरांत जागती आहे. लाडक्या जनाईच्या आठवणी तिच्या भक्तांनी जीवापाड जपून ठेवल्या आहेत.

संत जनाबाई

जनाबाईच्या माहेर म्हणजे, परभणीतलं गंगाखेड गाव. याच गावात जनाबाईचा जन्म झाला. पुढं संत बनलेल्या जनाबाईची इथं गावकर्‍यांनी समाधी बांधलीय. जनाबाईला जातं ओढू लागणार्‍या देवाची मूर्ती इथं दिसते. तिच्या सर्व घरकामांत मदत करणारा विठूराया भिंतीवरच्या चित्रांमध्ये दिसतो. दासी जनीचं संत कबिरांनी केलेल्या कौतुकाचा प्रसंगही इथं चितारण्यात आलाय. इथून दरवर्षी जनाबाईची दिंडी पंढरपूरला जाते.

संत जनाबाई आयुष्यभर राहिल्या त्या पंढरपुरात संत नामदेवांच्या घरी. दासी म्हणून राहिलेल्या जनाबाईंच्या वाट्याला इथं काबाडकष्ट आले. पण तिला या कामांमध्ये मदत केली प्रत्यक्ष विठूरायानं. जातं, मडकी, गोवर्‍या असा सगळा जनीचा संसारच पंढरपूरकरांनी इथं जपून ठेवलाय. तिचा हा संसार पाहिल्याशिवाय वारकरी पंढरपुरातून परतत नाहीत.

दास्यभावाचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे संत जनाबाई

जनाबाईचे अभंग दूरदूपर्यंत लोकप्रिय झाले आणि तिची ख्याती कबिरांच्या कानी गेली, इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री आहे तरी कोण या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाईच्या भेटीसाठी पंढरीस आले. तिथे आल्यावर त्यांना कळाले की ती नामदेवांच्या घरी कामास आहे. तिथे गेल्यावर त्यांना कळाले की ती गोपाळपुरास गोव-या थापायला गेली आहे, तिला येण्यास काही अवधी लागेल.

दासीचे घरकाम करणारी, गोव-या थापणारी बाई अभंग लिहिते याचे त्यांना फार अप्रूप वाटले आणि ते तिची वाट बघत तिथे थांबण्याऐवजी गोपाळपुरास गेले.तिथे नदीकाठावर दोन पोक्तवयीन स्त्रिया एकमेकीशी भांडत असल्याचे दृश्य त्यांना दिसले. त्या दोघींच्या मधे गोव-यांचा मोठा ढीग होता, गोव-या चोरल्याचा एकमेकीवर त्या आरोप करत होत्या.कबीर काही वेळ त्यांचे भांडण बघत तिथेच उभे राहिले. अन् मग काही वेळाने त्यांनी त्या दोघींना विचारले की, ‘‘इथे जनाबाई नावाची कोणी स्त्री आहे का?’’त्यांच्या या प्रश्नाने दोघींपैकी एक स्त्री उसळून बोलली -‘‘ही काय, हीच की जनी! चोरटी! माझ्या गोव-या चोरून माझ्याशी भांडण करत्येय! अन् वर तोंड करून मलाच शानपन शिकवत्येय.’’त्या बाईच्या या उद्गाराने कबिरांना थोडासा धक्का बसला. कारण त्यांच्या मनात जनाईचे वेगळेच चित्र उभे राहिले होते. तरीही त्यांचा त्या बाईच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही. ते तिथेच आशाळभूत नजरेने त्यांचे भांडण बघत उभे राहिले. त्यांनी न राहवून दुसरीला विचारले की, ‘‘तूच जनी आहेस का?’’

संत जनाबाई

यावर ती हातातल्या गोव-या खाली टाकून बोलती झाली, ‘‘होय बाबा, मीच ती जनी. तुला काही त्रास आहे का माझा?’’ तिच्या या उत्तराने अन् तिच्या वर्तणुकीने गोंधळून गेलेले कबीर आपली काही तरी चूक झाली असा विचार करून तिथून पाय काढता घेण्याच्या मन:स्थितीत होते.मात्र जनाईच्या होकाराने दुस-या बाईला अजून बळ आले. ती कबिरांना म्हणाली, ‘‘हे बघा, तुम्ही कोण हायसा मला ठाव न्हाई, पर तुमी एक काम करा. आमच्या दोघींच्या बी गोव-या यात आहेत. तुमी आमच्या आमच्या गोव-या निवडून वेचून द्या. तुमी एव्हढं काम करा अन् मग हिथून जावा.’’आता गोव-या सारख्याच दिसतात. शेणाच्या, गोल आकाराच्या त्या गोव-यात कुठली गोवरी कुणाची हे कसं ठरवणार याचं कोडं कबीरजींना पडलं. कबीर विचारात पडलेले बघून जनाई म्हणाली, ‘‘त्यात काय इतका विचार करायचा? अगदी सोप्पं काम आहे.’’

आता कबीरजी चकित झाले होते.सारख्या दिसणा-या शेणाच्या गोव-यात कुठली गोवरी कुणाची हे ओळखता येणं अशक्य होतं, मात्र जनी म्हणतेय की हे सोप्पं आहे. हे कसं काय सोपं असू शकतं किंवा तिच्याकडे या समस्येचं काय उत्तर आहे हे ऐकण्याकरता कबीरजी थोडे आतुर झाले. त्यांची आतुरता त्यांच्या चेह-यावर झळकली.कबिरांच्या चेह-यावरची उत्सुकता बघून जनाई हसून म्हणाली, ‘‘अहो, महाराज हे अगदी सोपं काम आहे. सर्व गोव-या एके ठिकाणी करा. अन् त्यातल्या प्रत्येक गोवरीला कानी लावा. ज्या गोवरीतून ‘विठ्ठल, विठ्ठल’ आवाज येईल ती गोवरी माझी. अन् ज्यातून आवाज येणार नाही ती गोवरी हिची!’’जनाईच्या उत्तराने कबीरजींचा चेहरा एकदम फुलून आला. अन् त्या दुस-या बाईचा चेहरा गोरामोरा झाला.कबीरजी पुढे झाले आणि त्यांनी त्या ढिगातील दोन गोव-या उचलल्या. गोव-या उचलून कानी लावल्या अन् काय आश्चर्य, त्या गोव-यातून ‘विठ्ठल विठ्ठल’ असा आवाज येत होता.

संत जनाबाई

आपण इथं येऊन कोणतीही चूक केली नाही. आपण एका महान कवयित्रीला भेटत आहोत. जिच्या विचारात देव वसतो आहे’, हे त्यांच्या लक्षात आलं. कबिरांनी सा-या गोव-यांची वाटणी केली. त्या बाईच्या काही मोजक्याच गोव-या होत्या तर बहुतांश गोव-या जनाबाईच्या होत्या.जनाईच्या गोव-यांच्या ढिगावर त्या बाईने आपल्या काही गोव-या लावून तो ढीग आपलाच असल्याची खोटी बतावणी केली होती अन् वर जनाईला ती खोटे ठरवत होती.

गोव-यांची वाटणी झाल्यावरही कबिरांच्या चेह-यावर प्रश्नचिन्ह कायम होते.जनाईने त्यांच्या मनातील शंका ओळखली आणि म्हणाली, ‘‘या गोव-यातून हा आवाज कसा आला याचं तुम्हाला कोडं पडलंय का? एकदम साधी गोष्ट आहे. मी या गोव-या थापताना विठ्ठलाचेच नाव घेते अन् माझ्या ध्यानी मनी पांडुरंग असतो, तोच या गोव-यातसुद्धा असतो.’’कबीर चकित होऊन जनाबाईकडे पाहत राहिले अन् मग त्यांनी स्वत:ची ओळख करून दिली. कबीरजींचा परिचय ऐकून जनाबाई त्यांना घरी घेऊन गेल्या.एकाग्रचित्ताने केलेल्या नामस्मरणातील ताकद सांगणारी ही घटना सत्य न समजता केवळ एक आख्यायिका असावी असा जरी विचार केला तरी यातील भावार्थ श्रेष्ठ आणि चिरंतन असाच आहे. भक्ती कशी करावी याचे नियम नाहीत, मात्र ती मनापासूनची असावी

, ती सच्ची असली की आपल्यालादेखील ईश्वराचा सर्वत्र प्रत्यय येतो.त्या विठ्ठलभक्तीत एवढ्या रंगून जाऊन सेवा करत की, विठ्ठल प्रत्यक्ष येऊन त्यांना सेवेत साहाय्य करत असे.एकदा जनाबाईचे आणि तिच्या शेजारच्या बाईचे शेणाच्या गोवर्‍यांवरून कडाक्याचे भांडण झाले; कारण दोघींनी जवळजवळच गोवर्‍या उन्हात सुकण्यासाठी घातल्या होत्या. त्यांचा हा वाद मिटवण्यासाठी त्याच गावातील पंच तेथे आले. त्यांनी ‘तुमच्या गोवर्‍या कशा ओळखायच्या ?’, असे त्या दोघींना विचारले. तेव्हा जनाबाईने सांगितले, ‘‘ज्या गोवरीतून ‘विठ्ठल’ नामध्वनी ऐकू येईल, ती माझी !’’ त्याप्रमाणे पंचांनी कानाला गोवर्‍या लावल्या तेव्हा खरंच संत जनाबाईंच्या गोवर्‍यांतून ‘विठ्ठल’ नामध्वनी ऐकू आला. 

आयुष्य

पंढरपूरजवळ असलेल्या श्रीक्षेत्र गोपाळपूर येथील संत नामदेव आणि संत जनाबाई यांच्या अस्तित्वाने पावन झालेला संत नामदेवांचा वाडा !

­संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनीही विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. ‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’

असे त्या म्हणत असत. संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरू होते.

श्री संत ज्ञानदेव-विसोबा खेचर-संत नामदेव-संत जनाबाई अशी त्यांची गुरुपरंपरा आहे.

संत ज्ञानदेवांच्या प्रभावळीतील सर्व संतांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले आहे.

‘विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा।।’ हा प्रसिद्ध अभंग जनाबाईंचाच आहे.

त्यांना संत नामदेवांमुळे सतत संत-संग घडला होता.

संत ज्ञानदेवांविषयीही त्यांचा भक्तिभाव अनन्यसाधारण होता.

‘परलोकीचे तारू। म्हणे माझा ज्ञानेश्र्वरु।’ असे त्यांनी ज्ञानेश्र्वरांविषयी म्हटले आहे.

गवऱ्या-शेण्या वेचताना, घरातील इतर कामे करत असताना त्या सतत देवाचे नामस्मरण करत असत.

जनाबाईंच्या नावावर असलेले एकूण सुमारे ३५० अभंग सकल संत गाथा या ग्रंथात मुद्रित झाले आहेत.

त्यांचे अभंग कृष्णजन्म, थाळीपाक, प्रल्हादचरित्र, बालक्रीडा या विषयांवर आहेत.

हरिश्चंद्राख्यान नामक आख्यानरचनापण त्यांच्या नावावर आहे.

संत जनाबाईंच्या थाळीपाक व द्रौपदी स्वयंवर या विषयांवरील अभंगांनी महाकवी मुक्तेश्र्वरांना

एकनाथांचे नातू स्फूर्ति मिळाली होती.

संत जनाबाईंची भावकविता ही भगवंताच्या प्रेमाने ओतप्रेत भरलेली आहे.

पूर्ण निष्काम होऊन लौकिक, ऐहिक भावना विसरून त्या विठ्ठलाला शरण गेलेल्या आहेत.

आत्मज्ञानाचा साक्षात्कार घडण्यापूर्वीच त्या निर्विकार झाल्या आहेत.

संत जनाबाईंच्या जीवनातील अनंत अनुभूती त्यांनी त्यांच्या रचनांतून रेखाटल्या आहेत.

नामदेवांवरील भक्ति-प्रेमभाव, संत ज्ञानदेवांविषयी असलेला उत्कट भाव,

संत चोखोबांच्या भावसामर्थ्याचे अनुसरण,

तसेच विठ्ठलाविषयीचा भक्तिभाव त्यांच्या काव्यात ओतप्रोत भरलेला दिसून येतो.

वेळप्रसंगी देवाशी भांडायला पण त्या कमी करत नाहीत.

‘वात्सल्य, कोमल ऋजुता, सहनशीलता, त्यागी वृत्ती, समर्पण वृत्ती, स्त्री विषयीच्या भावना संत जनाबाईंच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येतात,’

असे ज्येष्ठ अभ्यासक रा. चिं. ढेरे हे जनाबाईच्या काव्याचे रसग्रहण करताना म्हणतात.

तत्कालीन संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत सोपान, संत गोरा कुंभार, संत चोखा मेळा, संत सेना महाराज आदि सत्पुरुषांच्या जीवनाचा,

सद्गुणांचा आढावा घेणारी पद्यरचना करून संत जनाबाईंनी पुढील पिढ्यांवर एकप्रकारे उपकारच करून ठेवले आहेत.

त्यांची भाषा सर्वसामान्य माणसांच्या हृदयाला जाऊन भिडते.

संत जनाबाईंचे बरेचसे अभंग नामदेव गाथेमध्ये आहेत.

संत जनाबाई श्री क्षेत्र पंढरपूर येथे महाद्वारी,

आषाढ कृष्ण त्रयोदशी शके १२७२ या दिवशी समाधिस्थ होऊन पांडुरंगात विलीन झाल्या.


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

Source :- Wikipedia and Bal Sanskar

संत जनाबाई अभंग । संत जनाबाई अभंग 180 । संत जनाबाई कविता मराठी ।

संत जनाबाई चरित्र । sant janabai ।

sant janabai abhang । sant janabai che abhang । sant janabai mahiti ।

sant janabai kirtan । sant janabai abhang in marathi

संत जनाबाई – sant janabai 

View Comments

  • याच संत जनाबाई चे अभंगातुन
    गुरव समाजाचे संत श्री संत काशिबा महाराज गुरव यांचे
    वर्णन आलेले आहे ,
    श्री,संत सावता माळी यांचे अभंगाचे लेखक म्हणुन
    ,, माळ्या सावत्याचा काशिबा गुरव ,, असा ऊल्लेख केलेला आहे ,
    कृपया त्यांचेही चरित्रावर चिंतन व्हावे ,हीच अपेक्षा

  • संत जनाबाईचे मंदिर कापरी.ता.शिराळा. जि.सांगली या ठिकाणी आहे.जुन्या मंदिराची मागील दहा वर्षापूर्वी पुनर्बांधणी केली आहे.या गावाशी संत जनाबाईचा काहीतरी संबंध असावा किंवा यागावी काही काळ वास्तव्य असावे. कदाचित संत जनाबाईचे महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर असावे.
    अमोल विलास पाटील. रा.कापरी ता.शिराळा. जि.सांगली.मो.9921250507

  • KINDLY ADVISE HOW TO KNOW KNOWLEDGE OF JANABAI IN ENGLISH. REQUEST ENGLISH TRANSLATION OF THIS POST ON SANT JANABAI.