वर्षाकाळी नदियां पूर्ण भरती – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ९८४

वर्षाकाळी नदियां पूर्ण भरती – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ९८४


वर्षाकाळी नदियां पूर्ण भरती ।
येऊनी मिळती सिंधुमाजीं ॥१॥
ऊष्ण काळी न्यून आटोनियां गेली ।
नाहीं खंती केली सिंधु त्यांतें ॥२॥
सुखदुःखभोग भोगितां प्राचिनी ।
अखंड सज्जनीं शांती असे ॥३॥
नाहीं तया भूती सर्व ब्रह्मएक ।
अनुभऊनी सुख भोगिताती ॥४॥
तत्त्वमसी बोध आत्मानात्म भेदले ।
दृश्य विसरले भास आधीं ॥५॥
सज्ञान चेईलें अज्ञान निदेलें ।
विपरीत केलें सुपरीत ॥६॥
द्रव आणि स्थिर मुळीं एक नीर ।
झाला ज्ञानेश्वर स्वयं ब्रह्म ॥७॥

अर्थ:-

पावसाळ्यामध्ये नद्यां आपल्या बरोबर पुष्कळ पाणी घेऊन समद्राला मिळतात. उन्हाळयांत त्या आटून गेल्यामुळे पाणी थोडे आणतात म्हणून ज्या प्रमाणे समुद्राने त्याबद्धल कधी खेद केला नाही.त्याप्रमाणे सज्जनही अखंड शांती असल्यामुळे पूर्वकर्मानुसार प्राप्त होणाऱ्या भोगाबद्दल सुखदुःख मानीत नाहीत त्याना त्याची खंती वाटत नाही. कारण आपण ब्रह्मरुप आहोत व तेच ब्रह्म सर्व भूतमात्रात भरलेले आहे. असा त्यांचा अनुभव असतो.तूं ब्रह्म आहेस या उपदेशाने झालेला बोध त्यांच्या ठिकाणी असल्यामुळे आत्मानात्मविचाराने अनात्म्याचा नाश होऊन गेलेला असतो. म्हणजे दृश्य पदार्थ सत्यत्वाने भासतच नाहीत. त्याच्या ठिकाणी अज्ञानाची झोप जाऊन त्यांना ज्ञानाची जागृती आलेली असते. व बुध्दीचा विपरीतपणा जाऊन ते योग्य काम करु लागते.पाणी पातळ असो किंवा गारेप्रमाणे घट्ट असो. ते पाणीच असते. त्याप्रमाणे ब्रह्म कोणत्याही स्थितीत भासले तरी ते ब्रह्मच आहे. व तेच स्वयंब्रह्म मी झालो असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.


वर्षाकाळी नदियां पूर्ण भरती – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ९८४

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.