कळिकेमाजी ज्योती समत्वासी आली – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ९५८

कळिकेमाजी ज्योती समत्वासी आली – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ९५८


कळिकेमाजी ज्योती समत्वासी आली ।
तेचि सामावली दृष्टी ब्रह्मीं ॥१॥
सिंधुमाजी जैसें सैंधव मिळाले ।
तेवी मन झालें ब्रह्मींलीन ॥२॥
वृक्ष बीजामाजीं जैसा सामावला ।
बिंदु कां आटला महींत जेवीं ॥३॥
जीव तोच शीव होऊनियां ठेला ।
शब्द तो मुराला निशब्दांमाजीं ॥४॥
आतां मी तूं कैंचा सर्व एकाकार ।
जाहला ज्ञानेश्वर स्वयं ब्रह्म ॥५॥

अर्थ:-

अंतःकरणरूपी कळीमध्ये प्रकाशमान होणारी शुद्ध ज्योती विचार दृष्टीने ब्रह्मस्वरूपांत सामावली. म्हणजे जीवात्मा व ब्रह्म दोन्ही एक रूप झाले. ज्याप्रमाणे पाण्यांत मीठ एकरूप होऊन जाते. त्याप्रमाणे मन ब्रह्मस्वरूपांत लीन झाले. ज्या प्रमाणे वृक्ष त्याच्या बीजांत लोपतो अथवा पाण्याचा थेंब जमीनीत आटून जाते त्याप्रमाणे जीवपणा शीवा मध्ये त्यांत, मिळुन गेल्यामुळे निःशब्द परमात्याच्या ठिकाणी शब्द जिरुन जातो. अशी स्थिती झाल्यानंतर मी व तूं हा भेद राहात नाही. त्यामुळे ब्रह्मच मी झालो. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.


कळिकेमाजी ज्योती समत्वासी आली – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ९५८

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.