उपदेश उपरति ज्ञान ध्यानएकनिष्ठ – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७३०

उपदेश उपरति ज्ञान ध्यानएकनिष्ठ – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७३०


उपदेश उपरति ज्ञान ध्यानएकनिष्ठ । विज्ञान तें आटलेंरे दृश्यादृश्य तेथे दृष्ट । आदिअंत हरपला सर्व ब्रम्ह एक वाट । नित्य नेम चालतारे होय वैकुंठ ॥१॥
जे जो जे जो निजानंदे आत्माराम प्रसिध्द । उपदेश ऐसें बाळा मदालसा प्रबोध । उपजोनि संसारीरे एकतत्त्व तेंचि सिध्द ॥
द्वैताअद्वैत खोडी नि:शेष आटली आस । कल्पना हो बुडालीरे सर्वदिसे ह्रषिकेश । ममता हे समूळ माया हेही न दिसे उध्दस । हरपली स्वयंज्योति ऐसा होईरे उदास ॥२॥
विकृतिभान गाढें तेथें न दिसे बिरडें । इंद्रिय रसना दृढ याचें निरसलें कोडें । मिथ्या हे मोहपाश तोडी व्यसन सांकडे । मानस परिकर हेही शोधी निवाडे ॥३॥
प्रपंच झोंबो नेदी यांचे उठवी धरणें । शरीरजन्म मरण याचें करी कारे पारणें । निवटूनि सांडी बापा सर्वभरी नारायण ॥४॥
मी माझें दुजेपण तेथें वायां घेसी लाहो । निरशी ममता बापा करि हरिनामें टाहो । शून्य हें भेदि कारे जन्ममरण निर्वाहो ॥५॥
धारणा धीट करी ध्येय पणरे हें सांडी । अखंडता निजसुख कामधामरे मांडी । स्मरता नामावळी विषय हे शरीर सांडी । क्रुररे नव्हे बापा सदां आत्मा ने ब्रम्हांडीं ॥६॥
त्रिकाळज्ञान गुज अखंड आत्मारे चेतवी । नित्यता हरिकथा विष्णु कृष्ण मनरंजवी । सकळ परिपूर्ण होशी जीव शिवरे भावी । मन ध्यान एकरुप सर्वदा हरि हा गोसावी ॥७॥
शांति निवृत्ति क्षमा दया सर्वभूती भजन । आचरण एकपक्षें सर्वरुपी जनार्दन । अलक्षसंकल्प भावी सर्व होई नारायण । विसरे कामनारे सेवी ब्रम्हसनातन ॥८॥
एकट मन करी निवृत्ति धरी निर्वाहो । चेतवितां इन्द्रियांसी आत्मारामें नित्य टाहो । सेवा सुख करी बापा प्रसन्न लक्ष्मीचा नाहो ॥९॥
सुति मांडी नाममात्रे सेवी तत्पर रसना । उपरति तितिक्षारे लय लक्षि ध्यासि ध्याना । हारपेल मी माझें होशील ब्रह्मांडयेसणा । जिव्हा हें मन चक्षु करि श्रीगुर निरोपण ॥१०॥
तुझा तूचि विदेहि पां आत्मनाथ एकतत्त्वीं । हरपति इंद्रियेरे जिवशिव एकेपंक्ती । नाहीं नाहीं अन्य रुप स्वयें परात्माज्योती । सुटेल जन्ममरण उपजेल प्रत्यक्ष दीप्ती ॥११॥
आकाश तुज माजी हरपसि परब्रह्मीं । न भजतां इंद्रियांसी हरपति यया उर्मी । बीज तें निरुपिलें सहज राहेंरे तूं समी । दमशम रिगु निगु याचा दाहारे संगमीं ॥१२॥
तटाक देहभूमीरेचक कुंभक आगमी । चंद्रसूर्य ऐसे जाणा पूर्ण परिपूर्णरे रमी । लोलुंगता रिध्दिसिध्दि धारणाते मनोरमी । होसील तूंचि सिध्द गुरुशिष्य सर्वसमी ॥१३॥
राहो नेदी विषयसुख वायां उद्वेग विस्तार । प्रेमामृत हरिनाम हेंचि सेविरे तूं सार । भजतां नित्यकाळ तुटे विषयाचार ॥१४॥
उध्दट सुख साधी जेणें दिसे आत्मनाथ । बिंबामाजी बिंब पाहे सर्व होतुं सनाथ । निश्चित निराळारे निगम साधी परमार्थ । धिटिव ऐशी आहे सर्व पुरति मनोरथ ॥१५॥
उष्णाते घोटी बापासम चांदिणें धरी । तेथील अमृतमय होई झडकरी । लक्ष हें परब्रम्हीं सदा पूर्णिमा ते सारी । निवतील अष्टही अंगें वोल्हावति शरीरीं ॥१६॥
त्रिकाळज्ञानकळा येणें साधलेंरे निज । तितिक्षा मनोवेगें नित्य प्रत्यक्ष ब्रह्मबीज । साकार निजघटीं तो प्रगटे अधोक्षज । पर्वकाळ ऐसा आहे गुरुमुखेरे चोज ॥१७॥
हें ऐकोनिया पुत्र मातें विनविता पैं जाला । उपदेश ब्रह्म लक्षी सर्वत्र केला वो काला । सांडिल्ते संप्रधार आत्मा एकत्र वो केला । कैसे हें उपदेशणें वेदांसि अबोला ॥१८॥
ऐके तूं मदलसे मज आत्मरामीं । ऐकतां वो उपदेश बहुत संताषलो उर्मी । प्रेमामृतजीवनकळा वोल्हावतु असे धर्मी । नि:शेष विषये वोते समर्पीलें परब्रह्मीं ॥१९॥
विपरीत माते आप आपमाजि थोर । चैतन्य हें क्षरलेंसे हाचि धरिला वो विचार ॥२०॥
माझा मी गुरु केला मातेचा उपदेश । न दिसे जनवन सर्वरुप महेश । निराकारि एक वस्तु अवघा दिसे जगदीश । हारपले चंद्रसूर्यो त्याच्यामाजि रहिवास ॥२१॥
अनंत नाम ज्याचें त्याचा बोध प्रगट । गुरुखुण ऐसी आहे नित्य सेवी वैकुंठ । नेणें हें शरीर माया रामकृष्ण नीट वाट । उच्चारु वो एकतत्त्व सेवा सुख वो धीट ॥२२॥
हें ऐकोनि मदलसा म्हणे भला भला भला पुत्रराया । उपजोनि संसारी रे तोडि तोडि विषया । मुक्त तूं अससी सहज शरण जाय सदगुरु पाया । आदिनाथ गुरु माझा त्या निवृत्तिसी भेटावया ॥२३॥
तेथूनि ब्रह्मज्ञान उपदेश अपार । समरसें जनींवनीं राज्य टाकी असार । यामाजि हिंसा तुज द्वेषितारे चराचर । चैतन्य ब्रह्म साचे एकरुपें श्रीधर ॥२४॥
ज्ञानदेव निवृत्तीसी शरण गेला लवलाही । हरपली निज काया मन गेले ब्रह्मा डोहीं । निरसली माया मोहो द्वैत न दिसे कांही । अद्वैत बिंबलेसें जनवन ब्रह्म पाही ॥२५॥

अर्थ:-

चरित्रांत केल्याप्रमाणे मदालसा आपल्या मुलांना उपदेश करीत आहे हे पुत्रा परमात्म्याच्या ज्ञानाकरिता श्रीगुरूमुखांने उपदेश ग्रहण करून एकनिष्ठपणाने वैराग्य, ध्यान व ज्ञान संपादन केले असता प्रपंच ज्ञान बाधित होऊन दृष्ट अदृष्ट पदार्थाचा आत्मदृष्टीने लोप होऊन जातो. जगतच नाही असा अजातवांदाचा सिद्धांत पटल्या नंतर जगताची उत्पत्ति स्थिति व अंत हे भाषाच उरत नाही. एक सच्चिदानंदस्वरूप ब्रह्मच आहे व ते माझे स्वरूप आहे असा निश्चय होतो. पण अशा भूमिकेला प्राप्त होण्याला अनेक जन्मामध्ये नित्य नैमित्तिक कर्माचे आचरण घडले पाहिजे. तरच परमात्मा प्रगट होतो. हे बाळा, तूं आत्मानंदा विषयी सावध रहा हा उघड उपदेश मी तुला करीत आहे. कारण जन्माला येऊन जीव ब्रह्मैक्य ज्ञान संपादन करणे हेच एक मनुष्य जन्माचे साध्य आहे दैत तत्सापेक्ष अद्वैत यांचा समूळ निरास करून टाक व अशा कल्पना ह्या टांकून देऊन तूं सर्वत्र ऋषिकेशी परमात्मा भरला आहे. असे पाहा. म्हणजे माया ममता या ओसाड होऊन जातील. जेणे करून स्वयंप्रकाश परमात्म्याच्या ठिकाणी त्या नाहीशा होऊन जातील. असा तूं देहादि पदार्थाविषयी उदास होऊन जा. जगतांचे भान दुःखदायक असून त्यातून सुटण्याला ब्रह्मात्मैक्य ज्ञानाशिवाय दुसरा मार्ग नाही. जिव्हादि इंद्रिये बलवान आहेत. यातून कसे सुटावे? इत्यादी कोडी आपोआप सुटतात. मिथ्या दुःख देणारा मोहपाश तोडून टांक व्यसनाने संकट, तसेच कष्ट देणाऱ्या मनास प्रपंचाचा विचार कर व त्यांत सत्य काय आहे ते पाहा. दुःख देणारा प्रपंच,शरीर, जन्ममरण ही सर्व अज्ञान कार्ये आहेत. याचे जे अज्ञान त्याचा नाश करून सर्व नारायण स्वरूप आहे असा निश्चय कर.ज्या व्यवहारांत हा मी आहे. हे माझे आहे व हे दुसऱ्याचे आहे. याशिवाय दुसरी गोष्ट नाही. याला कारण असणाऱ्या अहं मम बुद्धीचा नाश कर. व ज्या अज्ञानामुळे जन्ममरण दिसतात त्याचाही नाश करून भगवन्नामाचा टाहो फोड. काम क्रोध सोडून धैयनि सतत ध्यान कर पण ध्येयाला भिन्न पाडु नको. असे नामस्मरण केले तर हे दुष्ट विषय शरीरातून जातील.आत्मा नित्य ब्रह्मरूप आहे. असा निश्चय कर.हरिकीर्तनांत, नामस्मरणांत मनाची करमणूक करून घे. व मनालाही नित्य एकरूपाने व सर्वास अधिष्ठान असणाऱ्या हरिचे ध्याने लाव तसेच ज्ञानस्वरूप सर्वांतरयामी अखंड अशा आत्म्याचे ज्ञानाचा प्रयल कर. शांती, विषयापासून मनाची निवृत्ति,क्षमा, दया, आणि सर्व प्राण्याविषयी आत्मत्व बुद्धि असू दे. तसेच सर्वाभूती भगवत्भाव ठेऊन कल्पनेतील व कल्पनेच्या पलीकडील पुढे होणारे सर्व परमात्मरूप आहे. असे समजून, वैषयीक इच्छा सोडून सनातन ब्रह्माचे ध्यान कर. मन एकाग्र करून विषयापासून निवृत्त होण्याचा प्रयल कर जर विषयांनी इंद्रियांना जागृत केले तर मोठ्याने आत्मारामाविषयी नामस्मरण कर. आनंद देणारा लक्ष्मीचा पति जो नारायण त्याचे चिंतन कर. सोडणे किंवा तोडणे हे ज्या जिव्हेमुळे होते. ती जिव्हा नामस्मरणांत तत्पर ठेव वैराग्य,कष्टावाचून दुःख सहन करणे व परमात्म्याच्या ठिकाणी मनाचा लय करणे असे केले तर अहं मम’ अध्यास जाऊन ब्रह्माएवढा व्याप्त होशील अरे तुझी वाणी, मन, डोळे, इत्यादि इंद्रिये श्रीगुरूंच्या किर्तनांत तत्पर ठेव.इंद्रियांचे तडाख्यात न जाता तूं आपल्या आपल्याशी च विचार करशील तर मला देहसंबंध नसून एकरूप परमात्म्यातच मी आहे. असे ज्ञान प्रगट होऊन जन्ममरणांतून सुटशील. इंद्रियांना विषय न दिलेस तर त्यांची कसमस मोडून आकाशादिप्रपंचासह तुझा परमात्म्यांत लय होईल हे वर्म तुला सांगितले.आतां ब्रह्मत्वाचा निश्चय कर जीवब्रम्हैक्यज्ञानानंतर शम, दम,इंद्रिये विषय संबंध या सर्वांना मिथ्याच ठरते. देहरूपी किनाऱ्यावर रेचक, कुंभकरूपी उगवणारे चंद्र सूर्य आहेत. असे जाण त्या ध्यानैक तत्पर होऊन मन रममाण झाले तर तुला रिद्धिसिद्धी प्राप्त होतील. व गुरू शिष्यांच्या ठिकाणी एकरूपाने असणारे परमतत्त्व तूंच होशील प्रेमामृतरूपी व सर्वांचे सार ते घेतले असता संसारच निवृत्त होतो. असेच नेहमी नामस्मरण करशील तर विषय सुटून वृत्ति एकाकार होईल.आत्मज्ञानाने परमसुख प्राप्त करून घे. सर्व जीवांमध्ये एक परमतत्त्व बघ व तूही परमात्मरूप हो ज्या योगाने सर्व मनोरथ पूर्ण होतात.त्या वेदांने सांगितलेल्या निश्चित मर्गानी परमार्थ साध. ताप नाहीसा करून शीतलत्व देईल अशा चांदण्यातील परमात्मरूप पौर्णिमा पहा. व चंद्राचे ठिकाणी तूं चकोर पक्षी होऊन अमृतमय हो. त्यायोगाने शरीर शांत होऊन अष्टसात्त्विक भाव उमटतील.अशा त-हेच्या साधन चतुष्टय संपत्तीने स्वतःचे ज्ञानस्वरूपत्व प्राप्त होईल. तितिक्षेसह तीव्र इच्छेने प्रयल केला तर या शरीरांतच ब्रह्मभाव प्रगट होईल. असे हे गुरूमुखांने श्रवण करणे ही मोठी पर्वणीच आहे. हा उपदेश ऐकून मुलगा म्हणतो.ज्या परमात्मवस्तुबद्दल वेदही गप्प बसतो. अशा लक्ष्यब्रह्माच्या उपदेशाने सर्व अनात्मवस्तुंना मिथ्यात्व ठरून एकच आत्मा सर्वत्र व्याप्त कसा आहे. हे समजल.आई हा आत्मबोध ऐकून मला अतिहर्ष झाला. या उपदेशरूपी प्रेमामृत जीवनंकलेने अष्टसात्त्विक भाव उत्पन्न होऊन सर्व विषयही ब्रह्मरूप झाले. माझी काय विलक्षण स्थिति झाली आहे ही पहा. मी माझ्यामध्ये मावेनासा झालो. मला तर असे वाटते की परमात्मा जगतरूपाने नटला आहे. आई तुझ्या या उपदेशाने आता मी, माझा गुरूने हे सर्व जगत भिनत्वाने प्रतितीला येत नसून चंद्र सूर्यादि सर्व निराकार परमात्मरूपच दिसते. या जगदीशाने सर्व व्यापले आहे व त्यामध्येच माझा रहिवास आहे.असा बोध असून शरीरासह मायाकार्य जगताचे भान नष्ट होऊन नामस्मरणांत दंग असणे ही अनंताचे ज्ञानाची व नित्यमुक्ततेची गुरुखूण आहे. म्हणून निर्भय व अद्वैत आनंदरूप व्हावे. असे मुलांचे बोलणे ऐकून मदालसा म्हणते. बाळा धन्य आहे तुझी, विषयाचे पाश तोडणे हे मुख्य आहे. तूं मूळचा मुक्त आहेस म्हणून अदिनाथांच्या परंपरेतील सद्गुरू श्रीनिवृत्तीनाथ त्यांना शरण जा. सर्व ठिकाणी समब्रह्मच आहे. या दृष्टीने असार म्हणून प्रपंच टाकलास तर ठिक, नाहीतर त्यांचा व्देषाने त्याग केला तर ती हिंसा होईल. ब्रह्मचैतन्य एकरूपाने सर्वत्र व्याप्त आहे.मी गुरूनिवृत्तीनाथांना शरण झाल्याबरोबर अज्ञान व अज्ञानकार्य जगत नाहीसे होऊन मनासह स्वतःचे शरीर ब्रह्मरूप झाले. म्हणजे मी ब्रह्मरूप आहे हे जाणून जनवन सर्वत्र अद्वैत ब्रह्मदृष्टी झाली असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


उपदेश उपरति ज्ञान ध्यानएकनिष्ठ – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७३०

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.