आम्हीं संन्यास घेतला – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६९४

आम्हीं संन्यास घेतला – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६९४


आम्हीं संन्यास घेतला ।
देहादिकांचा त्याग केला ॥१॥
आम्ही संन्यासी संन्यासी ।
सदा राहों एकांतेंसी ॥२॥
चित्तचतुष्टया निरसिलें ।
अज्ञाना तिळोदक दिधलें ॥३॥
ज्ञानाचें विज्ञान आलें हातां ॥
आम्हां नाहीं शरीरममता ॥४॥
ब्रह्माहमस्मि शुध्दज्ञान ।
तेथील सांडिला अभिमान ॥५॥
बापरखुमादेविवरु विठ्ठ्लु ह्रदयीं ।
तोचि सबाह्यअभ्यंतर ठाई असे रया ॥६॥

अर्थ:-
मला ब्रह्मसाक्षात्कार झाल्यामुळे देहादिकाचा त्याग करून आम्ही संन्यास घेतला. त्यामुळे आम्ही संन्यासी नित्य परमात्मस्वरूपात राहू. चित्त चतुष्टय म्हणजे मन, बुद्धि,चित्त,अहंकार याचे निरसन करून आत्मस्वरूपांच्या अज्ञानाला तिळोदक दिले. म्हणजे त्याचा नाश केला. ज्या ज्ञानाने अज्ञानाचा नाश केला तें ज्ञानच परमात्मतत्त्व हाती आल्याने शरीराच्या ठिकाणी हे माझे शरीर आहे असा मम अभिमान राहिला नाही. त्याप्रमाणे ब्रह्माहमस्मि म्हणजे मी ब्रह्म आहे. या वृत्तिज्ञानाचाही अभिमान नष्ट झाला. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल, हृदयांत वास करणारा तोच अंतरबाह्य सर्व ठिकाणी आहे असे माऊली सांगतात.


आम्हीं संन्यास घेतला – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६९४

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.