पिंड निर्माण जीवकळा सरिसी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५८०

पिंड निर्माण जीवकळा सरिसी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५८०


पिंड निर्माण जीवकळा सरिसी ।
गति प्रवेशीं कैसी जाली ॥१॥
तेथीची रचना न कळे हो देवा ।
अनुभवाचा ठेवा काढुनी पाहे ॥२॥
वारपंगाचें लेणें लेवविसी
जाई जेणें ।
परी घरांतील ठेवणें नुमगसी ॥३॥
अणुचें प्रमाण न साहे डोळां ।
कैसा मुक्तीचा सोहळा
घेवो पाहसी ॥४॥
जळीं नांदला तो तरंगीं उमटला ।
मिळोनियां गेला सागरासी ॥५॥
बापरखुमादेविवरा विठ्ठला उदारा ।
ज्ञानाचा वेव्हारा होई बापा ॥६॥

अर्थ:-

शरिराबरोबरच जीवकला त्यात उत्पन्न झालेली दिसते. ती जीवकला शरिरात कशी प्रविष्ट झाली. त्याची रचना कशी आहे हे कोणालाही कळत नाही. येवढेया करिता स्थूल दृष्टी टाकुन सुक्ष्म दृष्टीने मुख्य सिध्दांताचा विचार कर.शरिरावरचे लेणे कालाच्या योगे नाश पावणारे अंगावर घालतोस पण आपल्या घरातील मुख्य परमात्म ठेवा तु समजत नाहीस. अणुयेवढा अत्यंत सुक्ष्म कण असतांनासुद्धा तो डोळ्यास देहतादात्म्यामुळे सहन होत नाही मग तू असा परमात्मरुप मुक्तीचा सोहळा कसा पाहाणार. पाण्यामध्ये पाणीपणा तो तंरगांमध्ये दिसतो. पुन्हा तरंग नष्ट झाल्यानंतर तो पाणीपणा पाण्यातच विरुन होऊन जातो. त्याप्रमाणे अस्ति, भाति, प्रिय हे परमात्म्याचे स्वरुप आहे. ते या ठिकाणी प्रतितिला येते. जगत प्रतिती नष्ट झाल्यानंतर अस्ति, भाति, प्रिय त्याचे भाव परमात्म्याचे ठिकाणी म्हणजे परमात्मरुपच असतात. हे रखुमादेवीचे पती व माझे पिता वरीलप्रमाणे जीवांच्या ठिकाणी आत्मज्ञानाचा व्यवहार होण्याविषयी तू त्यांना साहाय्य कर. असे माऊली सांगतात.


पिंड निर्माण जीवकळा सरिसी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५८०

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.