मनाची सृष्टि स्वप्न वर्तवी दृष्टी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५६०

मनाची सृष्टि स्वप्न वर्तवी दृष्टी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५६०


मनाची सृष्टि स्वप्न वर्तवी दृष्टी ।
अळंकारलें उठी गंधर्वनगर ।
तेथेंचिये राणिवेसाठीं कां
भ्रमु धरितासि पोटीं ।
जेथें जेथें पाहातां पाहणें
नुठी तोचि होई ।
म्हणोनि देखणीया जवळीके कीं
दृष्टिविण सुके तैसें स्वानुभवें
स्वानुभव मावळे ज्याच्या ठायीं ।
ते अवस्थेविण दृष्टि गोचर होई
वेगीं तें देखणेंचि दृष्टि विठ्ठल रया ॥१॥
तुझें तूंचि विंदान जाणोनि पाहीं ।
आपेंआपवीण विचारु नाहीं ॥२॥
म्हणौनि एकमेका मज आठवे
आठवेचि विसरोनि फ़ावे ।
पैं देहद्वयभाव विरोनि जाय
तेथें पदत्रयाची मांडणी कीं
तत्त्वत्रयाची वाणि या
पांचांते जेथ न फ़ावे ।
कर्मेद्रिया ज्ञानेंसी ज्ञानेंद्रियें जो
नेमेसी तंव ते विस्मो करुनि
पाहे सुखस्वानुभवादु:ख प्रकाशले
ते सुख केवि फ़ावे ।
याचिया गुणागुण न गुंजिजे ह्र्दयीं
सुखावोनि तेंचि तूं राहे रया ॥३॥
मग आंग शेजबाज कीं हे बाह्येंद्रियांचे
उपभोग मानिसीं साच ।
जरी सोंग स्वप्नींचें असे ऐसें
जाणतां निदसुरा होसी दातारा
या स्वप्नींच्या वोरबारा
बापा वोथरसि कांपा ।
म्हणोनि बापरखुमादेविवरुविठ्ठलु
उघडे डोळांचि निधान देखिजे
तवं मार्ग सोपा ।
म्हणोनि तेथींच्या तेथें पाहतां
याविण नाहीं दुजें ।
वाया खटपट करिसी बापा रया ॥४॥

अर्थ:-

स्वप्न आणि गंधर्वनगर हे मनकल्पित खोटे असते. त्याप्रमाणे जागृत व्यवहाराचे ऐश्वर्यही खोटे आहे. त्याच्या प्राप्तीकरिता भ्रमित होवु नकोस ज्ञाता व ज्ञान ज्या ठिकाणी उठत नाही अशा परमात्मप्राप्तिकरिता खटपट कर, विचाराचे दृष्टीने व्यवहारिक दृष्टी नष्ट होऊन स्वानुभव ज्याचे ठिकाणी मावळतो ते स्वरूप स्वानुभवाचे आपले ठिकाणी तूंच हो. ती दृष्टी म्हणजे अवस्था दृश्यावाचून परमात्मा श्रीविठूरूपच आहे. तू आपल्या आत्मस्वरूपाच्या छंदानी आत्मविचाराशिवाय दुसरा विचारच नाही. असे जाणून आत्मस्वरूपाकडे पाहा. असे पाहू लागलास म्हणजे पाहण्याचा विषय परमात्मा आणि त्यास पाहणारा मी एक अशी प्रथम काही वेळ निदिध्यासनाची स्थिती असते. पाठीमागून तो आठवही विसरून आपोआप परमात्मरूप प्राप्त होते. पण त्याठिकाणी स्थूल, सूक्ष्म देहद्वय विरून जाऊन तेथे तत्त्वमसि या तीन पदाची एकता किंवा जीव, ईश, आणि परमात्मा हे तीन व पूर्वीचे देहद्वय मिळून पांच संख्या होते व त्या पाच संख्येचा परमात्मस्वरूपाचे ठिकाणी नियमीत असलेली ज्ञानकर्मेद्रिये यांचा संभवही नसतो. असा स्वानुभवाचा मोठा विस्मय आहे. सुखरूप परमात्माच स्वानुभवाने प्राप्त झाल्यानंतर दुःखच सुख कसे होते या विवंचनेत तू न पडता त्या सुखात राहा. एक बाज त्याजवर बिछाना व त्याच्यावर आपले अंग अशा तहेचे बाह्यंद्रियांचे उत्तम भोग जर सत्य मानशील तर आत्मस्वरूप ज्ञानशून्य असा झोपी गेल्यासारखा होशील. स्वप्नातल्या व्यवहारावर विश्वासून का राहतोस. तो भ्रम टाकून देऊन आत्मस्वरूप डोळे उघडून अनंत सुखाचा ठेवा, माझे पिता व रखुमाईचे पती श्रीविठ्ठल त्यांना डोळे भरून पाहा.म्हणजे तुला आत्मप्राप्तीचा मार्ग सोपा होईल. याकरिता जागच्या जागीच म्हणजे स्वस्वरूपाच्या ठिकाणी परमात्मस्वरूप पाहवे. हेच मुख्य कर्तव्य आहे. याशिवाय दुसरा मार्ग नाही. म्हणून दुस-या फुकट खटपटी कां करतोस?असे माऊली सांगतात.


मनाची सृष्टि स्वप्न वर्तवी दृष्टी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५६०

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.