वृंदावनीं वनमाळी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५१५

वृंदावनीं वनमाळी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५१५


वृंदावनीं वनमाळी ।
खेळे गोपींसी धुमाळी ।
मदनमेचुची नवाळी ।
रसाकाळीं मनोहर ॥१॥
तयाचे करी पा स्मरण ।
आळसु न करी अंत:करण ।
भीतरलीया सुमनपण ।
निहारण होईल ॥२॥
बरवेपणाचेनि मिसें देवातें
वाणि या सौरसे ।
जडत्त्व फ़िटेल तया सरिसें ।
रसनें ऐसें चुकों नको ॥३॥
तरी हा देवो तूं न्याहाळीपां ।
पिसाटपण फ़िटेल बापा ।
पावन होसी परमस्वरुपा ।
नेत्री ऐसा चुकों नको ॥४॥
वेगीं क्षेम देऊनिया निविजे ।
ऐसें दैव कैं लाहिजे ।
जरी तो ह्र्दयीं ध्याईजे ।
तै पाविजे अंगसुखा ॥५॥
मन भ्रमर येकी हेळा ।
झेपावे पदकमळा ।
बापरखुमादेविवरा विठ्ठला ।
होईल जवळा सौरसु ॥६॥

अर्थ:-

वृन्दावनामध्ये भगवान श्रीकृष्ण गोपी बरोबर खेळ खेळत असता, मदनाची पर्वा न करता, शृंगार रसांत फार मनोहर दिसत होते. त्या भगवान श्रीकृष्णचे आळस न करता अंतःकरण पूर्वक स्मरण करावे. त्याचे स्मरण केले तर अंत:करणातील सर्व दोष जाऊन त्याला फुलपण प्राप्त होईल. त्याच्या ह्या चांगुलपणाने आनंदाने त्या देवाचे नांव घेतलेस तर लागलीच तुझे जडत्व नष्ट होई. म्हणून हे जिव्हे त्याचे नामस्मरण करण्यास चुकू नका. त्या देवाचे रूप पाहिले तर प्रपंचाच्या ठिकाणी असलेले सत्यपणाचे वेड फिटून पावनरुप होशील म्हणून हे डोळ्यानों त्याचे रुप पाहण्यात चुकु नका.जर हृदयांत त्याचे ध्यान केले तर सगुण सुखास प्राप्त होशील. अरे असे भाग्य तुला केंव्हा प्राप्त होणार. ज्याप्रमाणे भ्रमराला दैवाने कमळाची प्राप्ती होते त्याप्रमाणे मनाला जर श्रीहरिच्या पदकमलाची प्राप्ती झाली. तर ते माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल तुझ्या हृदयांत आनंदाने प्रगट होतील. असे माऊली सांगतात.


वृंदावनीं वनमाळी – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५१५

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.