चौर्‍यांसि लक्ष योनि क्रमुनि सायासीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५०२

चौर्‍यांसि लक्ष योनि क्रमुनि सायासीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५०२


चौर्‍यांसि लक्ष योनि क्रमुनि सायासीं ।
नरदेहा ऐसें भांडवल पावलासी ।
जतन करीरे गव्हारा ।
भजे न भजे या संसारा ।
बीज सांडूनि असारा वायां झोंबतोसी ॥१॥
हातींचिया लागीं भूमि चाळितासी ।
आप नेणतां तूं पर काय
चिंतिसी मन एक स्वाधीन
तरी खुंटलें साधन ।
सर्व सुखाचें निधानहरि पावसी रया ॥२॥
तृणें पशु झकविले ते क्षीरातें ।
तैसा विषय पाल्हाळें निज चुकलासी ।
कोटि युगें जन्मवरी ।
येतां जातां येरझारीं ।
दु:ख भोगिसी दुर्धर रया ॥३॥
पुत्रकलत्र भवविभव विचित्र ।
होय जाय सूत्र तूं
आप न म्हण ।
तुझा तूंचि नाहीं ऐसें
विचारुनि पाहीं ।
चेतवी चोरलासी वेगीं
सावध होई रया ॥४॥
तुज नाथिलाचि धिवसा ।
आस्तिकपणाच्या आशा ।
असते सांडूनि आकाशा ।
वायां झोंबतोसी ।
दिवस आहे तो धांवावे ।
नाहीं तरी फ़ुटोनि मरावे ।
मृगजळ हें अघवे पाहे रया ॥५॥
स्वप्नीं साचचि जोडे ।
थोडें ना बहुत हातां सांपडे ।
तुटले प्रीतीचे कुवाडे ।
ऐसें जाणोनिया शरण जाई निवृत्ति ।
तो सोडविल संसृति ।
बापरखुमादेविवरा विठ्ठलाचे
भक्ति रया ॥६॥

अर्थ:-

चौयांशी लक्ष योनि फिरत फिरत मोठ्या सायासाने या नरदेहाला आलास. परमात्म प्राप्तीला नरदेह भांडवल आहे. त्याकरता ते जतन कर. संसारात आयुष्य घालवू नको, परमात्मप्राप्ती साधनाचे बीज टाकुन या,असार संसारात झोंबणे हा वेडेपणा आहे. ठेवा आपल्या हातामध्ये असता तो मिळविण्यासाठी जमीन उकरीत बसणे हा जसा वेडेपणा आहे. त्याच प्रमाणे आत्मस्वरूप न जाणता देहादी अनात्म पदार्थाचे चिंतन करणे, हा वेडेपणा आहे एकदा मन तुझ्या स्वाधीन झाले तर बाकीच्या साधनांची जरूरीच नाही. त्या साधनाने सर्व सुखाचा ठेवा जो परमात्मा श्रीहरि तो प्राप्त होईल. गवताच्या नादी लागलेले वासरू जसे आईचे दूध पिण्यास विसरते. त्याप्रमाणे तू आभासमात्र विषयसुखाच्या पसाऱ्यात आत्मसुखाला चुकतोस. यामुळे कोट्यवधी युगे जन्ममरणाच्या येरझारीत दुःख भोगीत राहातो. या करिता संसारातील बायको पुत्र मित्रादि विचित्र ऐश्वर्य उत्पन्न होऊन क्षणमात्रात नष्ट होते. यांच्याशी संबंध ठेऊन हे माझे आहेत असे म्हणू नकोस. विचार करून पाहिले तर स्वतःचे शरीरसुद्धा तू नाहीस त्या जड शरीराला चेतना देणारा जो तू त्या तुझी तुच चोरी केलेलाआहेस म्हणून लवकर सावध हो.नाही त्या आस्तीकपणाच्या भरवशावर त्याच्या प्राप्तीची आशा धरणे वेडेपणा आहे. नित्यप्राप्त आत्मस्वरुप सोडुन आकाशा सारख्या पोकळाला का कवटाळतो आहेस. मृगजळामागे छाती फोडुन धावणारे हरिण मरते पण पाणी मिळत नाही. तसे ह्या संसारसुखाचे मृगजळ आहे. स्वप्नात पाहिलेले जागृतीत प्राप्त होते का?असा विचार करुन संसाराची प्रिती सोडुन जे श्री गुरु निवृतिच्या चरणी लागले त्यांना माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांनी भक्ती दिली व संसारतापातुन सोडवले असे माऊली सांगतात.


चौर्‍यांसि लक्ष योनि क्रमुनि सायासीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ५०२

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.