चुकलीया चुके- संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४९९

चुकलीया चुके- संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४९९


चुकलीया चुके ।
आपादिलिया भलें होय ।
तरी दु:ख दारिद्र भोगी कवण ।
तरि अवघेंचि विश्व कां
सुखी नव्हे रया ॥१॥
म्हणोनियां भ्रम सांडी नाथिला ।
जें जें कांहीं करीन
म्हणसी होणार तें होईल ।
न होणार तें नव्हेल ।
तूं फ़ुकाचि नाडसी रया ॥२॥
होणें न होणें निढळींच्या अक्षरीं ।
वोरबार करसील काह्या ।
पाईक वोळगे अठैप्रहर सेखीं
दैव तंव आणील ठायां रया ॥३॥
देखणें डोळा ऐकणें कानीं ।
जिव्हे कडु रस मधुर वाणी
श्वासोश्वास हे जयाची करणी ।
अनुभवी जाणती ज्ञानी ॥४॥
नाथिलाचि धिंवसा करुं पाहासी ।
दुराशा जवळि असतां ।
आकाश झोंबतोसी ।
आतांचे चिंतिलें आतांचि
न पाविजे ।
पुंढें कोण जाणे
काय पावसी रया ॥५॥
उपजत देहे मृत्युमुखीं पडलें ।
मी माझें करिसी किती ।
उठी उठी जागे आपुलिया हिता ।
बापरखुमादेविवराविठ्ठलाची
करी भक्ति रया ॥६॥

अर्थ:-
पूर्व जन्मांत सत्कर्म करण्यास जे चुकले त्यांना सुख प्राप्त होत नाही. आणि ज्यांनी पूर्व जन्मांत सत्कर्म संपादन केले असेल त्यांचे चांगले होते. असे जर मानले तर ईश्वर काही लोकांना दुःख दारिद्रयादि भोग का देतो. सर्वच विश्व सुखी का ठेवीत नाही. या प्रश्नाला कांही उत्तरच नाही असे होईल शिवाय ज्या ईश्वराला आपण दयाघन असे म्हणतो. त्याच्याच ठिकाणी विषमत्व व निष्ठुरत्व असा दोष दिल्यासारखा होईल. परंतु याचे समाधान असे आहे की तो न्यायी आहे. म्हणून तो जीवाच्या कर्मानुसार त्याला सुख दुःख देतो. म्हणुन तू भ्रम टाकून मी हे हे करीन ते होईल किंवा नाही होणार ही त्याची इच्छा असेल. परंतु तू त्याचा अभिमान का बाळगतोस होणे किंवा न होणे हे प्रारब्धानुसार असून त्यासाठी खटाटोप का करतोस. जसे अष्टोप्रहर काम करणाऱ्या नोकरास ठरलेला पगारच मिळतो. डोळ्यांनी पहाणे,कानानी ऐकणे, जिव्हेने गोड कडू रस चाखणे, वाणीने बोलणे एवढेच नाही तर आपले श्वासोश्वास ईश्वरच्छेने होत असतात हे ज्ञानी लोक जाणतात. दुराशा बाळगून केलेला व्यवहार म्हणजे आकाशाशी झोंबणे आहे. म्हणून तू जे इच्छशील ते तुला मिळेल पण ते काय मिळेल ते सांगता येत नाही. उपजणारा देह मृत्युमुखी जाणार तरी माझे माझे का करतोस हे टाकून आपल्या हितासाठी जागा हो व माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांची भक्ती कर असे माऊली सांगतात.


चुकलीया चुके- संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४९९

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.