नवांची खाणी दहाव्यानें शोकिली – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३००

नवांची खाणी दहाव्यानें शोकिली – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३००


नवांची खाणी दहाव्यानें शोकिली ।
अकराव्यानें जाली देशधडी ॥१॥
तें ब्रम्हपंथीं माखलें ।
मरोनि जागृत ते जालें
मन गे माये ॥२॥
अवघे अंबर माझें तिंबलें ।
ब्रह्मरसें पिळिलें वो रंग नव्हे ॥३॥
सार वियोगें माझें कर्म बुडालें ।
निष्कर्म जाले म्हणौनि नातळे ॥४॥
जागृति स्वप्न सुषुप्ति बुडाली ।
रखुमादेविवरें सहित गिळीली ॥५॥

अर्थ:-

श्रोत्र इंद्रियावांचून बाकीची नव इंद्रियांची खाण दहाव्या श्रोत्र इंद्रियाने महावाक्यश्रवण करून शोषण करून टाकले. आणि अकरावें जे मन त्याने तर या देहभावाला देशोधडीला लावले. अशारितीने या ब्रह्मपंथात मारले जाऊन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मन जागे झाले. माझे मनरूपी वस्त्र हे ब्रह्मरसामध्ये पिळले. परंतु कसलाही रंग आला नाही. अज्ञानी जीवांनी साररूप मानलेला जो प्रपंच त्याचा माझा वियोग झाल्यामुळे त्याचे पोषक जे कर्म ते बुडाले. म्हणजे संचित क्रियामाण या सर्व कर्माचा दाह होऊन मी निष्कर्म म्हणजे परमात्मरुप झाले. म्हणून लोकदृष्ट्या कर्माचा भोग असला तरी त्यांत मी गुंतत नाही. आता माझी जागृती, स्वप्न, सुषुप्ति हे सर्व बुडाली. म्हणजे रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांनी देहासहित गिळून टाकले. असे माऊली सांगतात.


नवांची खाणी दहाव्यानें शोकिली – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३००

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.