या अमरामाजी येखादा वोळगो म्हणे – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २९७

या अमरामाजी येखादा वोळगो म्हणे – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २९७


या अमरामाजी येखादा वोळगो म्हणे
तरी तो ठावो ठाकितां अतिदुस्तरु ।
भूमंडळीचे राज्य वोळगों म्हणे
तव तेथें न लभे अवसरु ।
नि:संग होऊनि यतिधर्म चाळूं
म्हणे तरी भिक्षेसी पडे विचारु ।
नि:प्रपंच हातीं टाळ दिंडी घेऊनियां
वोळगे तो हरिहरुरेरे ॥१॥
हरीचे विद्यावंत जालोरे आम्ही
जाऊनि पंढरपुरीं राहिलों ।
कळिकाळाच्या माथां पाय देऊनियां
वैकुंठ भुवनासि गेलोरेरे ॥ध्रु०॥
अष्टांगयोगे शरीर दंडूं पाहे तंव
येवढें कैचें कष्टसाधन ।
लय लक्ष लावूनि गुरुमंत्र जपों
म्हणो तरी स्थिर नव्हे अंत:करण ।
तल्लीन होऊन हरिकथा आयिको
म्हणो तरी ठायींचेच बधिर श्रवण ।
उदंड वाचे हरिहरि म्हणतां
फ़ुकासाठीं चुके पतनरेरे ॥२॥
चहुं वेदांचे गव्हर धांडोळितां
वेडावलीं साही दर्शनें ।
शून्य स्थावर जंगम सर्वत्र
व्यापून असणें ।
जळीं स्थळीं काष्ठीं पाषाणीं सरिसें
या दृष्टी पाहाणें ।
ऐसियातें सेवितां अविद्या लोपे
मा विश्वास मानिला मनें ॥३॥
जयाचिये वोळगे जातां आडकाठीच
नाहीं भीतरी गेलिया भान पाविजे ।
अरोधे विरोधें समतुल्य देणें न
मगतां अभरि देइजे ।
तो क्षणमाजीं दे तें नसरे कल्पकोटि
ऐसिये धुरे कां दुर्‍हाविजे ।
ऐसियाचे गांवींची सुखवस्तीची पुरे
मा बहुत काय अनुवादिजेरेरे ॥४॥
ऐसा वैकुंठपुरपति पुंडलिकाचिये भक्ती
अमूर्त मूर्तीस आला ।
भक्तां अमरपद देतुसें अवळीला
नामें यमलोक विभांडिला ।
जिहीं जैसा भाविला त्या तैसा पालटु
दाविला परि अणु एक नाहीं वेंचला ।
बापरखुमादेविवराविठ्ठलु आम्हां गीतीं
गातां जोडलारेरे ॥५॥

अर्थ:-

स्वर्गातील अमरांना ही त्याची प्राप्ती होणे दुस्तर आहे.पृथ्वीवरिल राजेराजवाड्याना शक्य नाही कारण विषयभोगातुन त्यांना तसा वेळ मिळत नाही.संन्यास घेतला तरी भिक्षेची चिंता असते ते फक्त टाळ दिंडी घेऊनच साधता येते. त्यामुळे तसे आम्ही पंढरीस गेल्याने आम्ही विद्यावंत झालो व कळिकाळाच्या माथ्यावर पाय देऊन वैकुंठाला पोहचलो.अष्टांग योगाचा थकवणारा अटापिटा करुन शरिर दंडित केले. लक्ष लाऊन गुरुमंत्र जपु लागलो तरी अंतःकरण स्थिर झाले नाही. हरिकथा ऐकायला गेलो तर कान बधिर झाले मात्र वाचेने उदंड हरि म्हंटले फुकटात पतन चुकले. स्थावर जंगम व्यापुन असलेल्या जळी स्थळी काष्टी पाषाणी असलेल्या त्याला पाहियला वेद व सहा शास्त्र ढुंडाळली त्यामुळे दृष्टी मिळाली व अविद्या गेली हा मनाला विश्वास दिला. पण त्याला ओळखायला कसली आडकाठी नाही.विरोधाला समत्युल्य करुन मोठे पद मिळवले. चक्क अमर झालो. ते त्याने क्षणभरात न संपणारे सगळे दिले कल्पकोटी देणाऱ्या गांवात सुखवस्ती केली. ह्या पेक्षा जास्त काय सांगु. असा तो वैकुंठपती पुंडलिकासाठी सगुण साकार झाला. त्याने यमलोकाला डावलुन भक्तांना अमरपद दिले. ज्या जसा भावला तसा त्याला मिळाला.व त्यासाठी एक अणु ही खर्च झाला नाही. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांना आम्ही गीत गात जोडले असे माऊली सांगतात.


या अमरामाजी येखादा वोळगो म्हणे – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २९७

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.