आकारीं नाहीं तें निराकारीं पाहीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २८८

आकारीं नाहीं तें निराकारीं पाहीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २८८


आकारीं नाहीं तें निराकारीं पाहीं ।
निराकारीं राही शून्याशून्य ॥१॥
जेथें शून्यचि मावळलें तेथें काय उरलें ॥
हेचि सांगे एके बोलें मजपासीं ॥२॥
शून्य कासय पासाव जालें
शून्य तें कवणें केलें ।
हें सांगिजोजि एक्या बोलें गुरुराया ॥३॥
आपण शून्याकार कीं आपण निराकार ।
आकार निराकार मूर्तिमंत दाऊं ॥
आकार निराकार ये दोन्हीं नाहीं ।
तेंचि तूं पाही आपणापें ॥४॥
जेथें अनुभवचि नाहीं तेंचि तूं पाही ।
स्वानुभवीं राही तुझा तूंचि ॥५॥
जेथें चंद्र सूर्य एक होती तेथें
कैचि दिनराती ।
ऐसें जे जाणती ते योगेश्वर ॥६॥
कर्माकर्म पारुषलें देवधर्म लोपले ।
गुरुशिष्या निमाले जाले क्षीरसिंधु ॥७॥
तेथें गोडीवीण चाखणे ।
जिव्हेवीण बोलणे नेत्रेंविण पाहणें
तेंचि ब्रह्मा ॥८॥
हातीं घेऊनियां दिवटी
लागिजे अंधारापाठीं ।
अंधार न देखे दृष्टी उजियेडु तो ॥९॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलु देखणा ।
दृष्टयद्रष्टेपणा माल्हावले ॥१०॥

अर्थ:-

निवृत्तिनाथ महाराज म्हणतात आकाराला आलेल्या विश्वामध्ये स्थूल दृष्टीने सच्चिदानंदादि कांही दिसत नाही.ते सच्चिदानंदादि निराकार परमात्मवस्तुच्या ठिकाणी पहा. आकाराच्या उत्पत्तीला कारण म्हणून एक माया मानली आहे. बोधाने त्या मायेचा लय परमात्मवस्तु मध्ये होतो. म्हणून त्या ब्रह्माला शून्यरुप मायेचेही शून्य असे म्हणतात. वास्तविक त्या निराकार परमात्मवस्तुच्या ठिकाणी शून्याशून्य असे धर्म नाही. त्या परमात्मवाच्या ठिकाणी तूं आत्मत्वाने राहा.असे पुष्कळ शास्त्रे सांगतात. हे श्रीगुरुराया, ज्या ठिकाणी शून्यच मावळून गेले. तेथे खाली काय उरले. हे मला थोडक्यात सांगा मला आपणा पासून समजून घ्यावयाचे ते असे की. ज्या मायेला शून्य असे म्हणतात. ती कोणापासून झाली? तिला कोणी केले? हीच पहिली शंका हे श्रीगुरुराया याचे प्रथम समाधान सांगा. श्रीगुरु म्हणाले आपण शून्याकार आहोत की निराकार आहेत, हे तुला कळण्याकरिता अगोदर आकार आणि निराकार यांचे स्वरुप दाखवितो. मायेचे कार्य नामरुपांदिक त्याला आकार असे म्हणतात. त्या परमात्मवस्तूच्या ठिकाणी, नामरुपादिकनाहीत म्हणून त्या परमात्म्याला आकाराच्या सापेक्षेने निराकार म्हणतात. माया ही अनिर्वचनीयनमिथ्या असल्यामुळे तिच्या ठिकाणी आकार हा धर्म नाही. अर्थात या धर्माच्या अपेक्षेने परमात्म्यावरती आलेला निराकारता धर्म ही पण नाही. ज्याच्या ठिकाणी दोन्ही धर्म नाहीत. असा परमात्मा स्वतः तुझा आत्मा आहे असा असा तु अनुभव घे. असे म्हटल्याने अनुभव घेणे हाही धर्म आत्म्यावरती राहील. पण तसे समजणे बरोबर नाही. कारण आत्मा अनुभवरुपच आहे. असे अनुभवरूप परमातत्व तुच आहेस. असा तूं आपल्याठिकाणी अनुभवाने राहा. अरे ज्या परमात्मतत्वाच्या ठिकाणी चंद्र, सूर्य एक होतात तेथे दिवस कसला? आणि रात्र कसली? तेथे काहीच राहत नाही. याचा अर्थ माया कार्य प्रपंच्यात ज्ञानाज्ञानाचा व्यवहार चालतो. ती ज्ञानाज्ञाने परमात्मस्वरुपाच्या ठिकाणी लय पावली. म्हणजे निरपेक्ष ज्ञानस्वरुप परमात्माच अवशेष राहातो असे जे निःसंशय जाणतात. तेच खरे योगेश्वर अरे, ज्या परमात्मस्वरुपाच्या ठिकाणी कर्म व अकर्म दोन्हीही दुरावले.देवा धर्माचा लोप झाला गुरु शिष्यही मावळून गेले. अशा परमात्मस्वरुपाच्या ठिकाणी म्हणजे आनंद समुद्रात आपले ऐक्य झाले असता द्वैताचा अभाव असल्यामुळे त्या परमात्मरुपाची गोडी या धर्मावांचून चाखावयाची असते. जिभेवांचून बोलणे आणि डोळ्यावांचून पाहाणे असते. अशी स्थिती जेथे असते. सेन नाव ब्रह्म त्या ब्रह्मदृष्टिने पाहिले असता. माया हा पदार्थ दिसतच नाही ज्याप्रमाणे हातात मोठी दिवटी घेऊन अंधार धरण्याकरिता पाठीस लागलेल्या मनुष्याच्या हातांत दिवटी असल्यामुळे अंधार न दिसता तो अंधारच उजेड होतो. त्याप्रमाणे माझे पिता व रखुमाईचे पती श्रीविठ्ठल, सर्वत्र हाच देखणा म्हणजे ज्ञानरुपाने असल्यामुळे त्याच्या अद्वैत बोधापुढे दृश्य द्रष्टेपणाचा भाव मावळून जातो. असे माऊली सांगतात.


आकारीं नाहीं तें निराकारीं पाहीं – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २८८

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.