श्रवणें कीर्तनें जाले ते पावन – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २१८

श्रवणें कीर्तनें जाले ते पावन – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २१८


श्रवणें कीर्तनें जाले ते पावन ।
सनकादिक जाण परम भक्त ॥१॥
जाली ते विश्रांति याचकां सकळां ।
जीवीं जीवनकळा श्रीमूर्तिरया ॥२॥
पादसेवनें आक्रूर जाला ब्रम्हरुप ।
प्रत्यक्ष स्वरुप गोविंदाचें ॥३॥
सख्यपणें अर्जुन नरनारायणीं ।
सृष्टि जनार्दनीं एकरुप ॥४॥
दास्यत्त्व निकट हनुमंते केलें ।
म्हणोनि देखिले रामचरण ॥५॥
बळि आणि भीष्म प्रल्हाद नारद ।
बिभीषणावरद चंद्रार्क ॥६॥
व्यास आणि वसिष्ठ वाल्मिकादिक ।
आणिक पुंडलिकादि शिरोमणी ॥७॥
शुकादिक योगी रंगले श्रीरंगी ।
परिक्षितीचा अंगीं ठसावलें ॥८॥
उध्दव यादव आणि ते गोपाळ ।
गोपिकांचा मेळ ब्रम्हरुप ॥९॥
अनंत भक्त राशी तरले ते वानर ।
ज्ञानदेवा घर चिदानंदीं ॥१०

अर्थ:-

या अभंगामध्ये नवविधा भक्ति करून कोण कोणते भक्त उद्धरून गेले ते ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत श्रवण, कीर्तन करून सनकादिक परम भक्त पवित्र झाले.जीवांचे जीवन असणारा जो पंढरीराय त्यांनी या याचक भक्तांना समाधान दिले.पादसेवन भक्ती करून अक्रूर नावांचा भक्त परब्रह्मरूप झाला.सख्य भक्तीने नर जो अर्जुन तो नारायणस्वरूप झाला याचा अर्थ सर्वसृष्टि हे ज्याचे स्वरूप आहे. असा जो जनार्दन त्याचे स्वरूपांत मिळाला.हनुमंताने एकनिष्टपणाने दास्यत्व भक्ति केल्यामुळे त्याला रामचरण प्राप्त झाले. तसेच बळी, भीष्म, प्रल्हाद, नारद, बिभीषण, व्यास वसिष्ठ वाल्मीक, चंद्र सूर्यासमान असणारे भक्त त्याच प्रमाणे भक्त शिरोमणी पुंडलिक, तसेच शुकादिक योगी हे सर्व भक्त श्रीरंग म्हणजे भगवान श्रीकृष्ण त्यांच्या भक्तिमध्ये रंगुन गेले. त्याचप्रमाणे उद्धव, यादव, गोपाळ आणि गोपी इत्यादि भक्तही भगवत्स्वरूप होऊन गेले.तसेच असंख्य भगवत्भक्त वानरही सच्चिदानंदरूप परमात्म्याच्या नामाने उद्धरून गेले. ते सच्चिदानंदस्वरूपच माझे घर आहे.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


श्रवणें कीर्तनें जाले ते पावन – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २१८

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.