ऐशिया माजीं तो निज एकांती राहिला – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १०२९

ऐशिया माजीं तो निज एकांती राहिला – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १०२९


ऐशिया माजीं तो निज एकांती राहिला ।
विठ्ठल अनुसरला भावें एके ॥१॥
नित्य प्रळय निद्रिस्त नित्य प्रळय मृत्यु ।
कल्पांती जीव जात मायाही नाही तेथ ॥२॥
तेंचि तूं होउनी राहें विश्वाशी ।
ठायींच्या ठायीं निवसी अरे जना ॥३॥
तेथें नाहीं दुःख नाहीं तहान भूक ।
विवेकाविवेक नाहीं तेथें ॥४॥
ऐसें तें पाहोनी तये तृप्ती राहोनी ।
तेंची तूं जाणोनी होई बापा ॥५॥
बापरखुमादेविवरू विठ्ठलुगे माये ।
स्वस्वरूपी राहे तये कृपा ॥६॥

अर्थ:-

जे प्रेमाने श्रीविठ्ठलाला शरण जातात अशा पुरूषांच्या अंत करणांत परमात्मा प्रगट असतो. मृत्यूचे म्हणजे प्रलयाचे तीन प्रकार आहेत. निद्रा ही नित्यप्रलय आहे. तसे मृत्यू हा एक प्रलय आहे व कल्पांत हा एक प्रलय आहे. आणि चवथा प्रलय म्हणजे ब्रह्मज्ञान झाल्यानंतर माया व मायाकार्य पदार्थाचा अत्यंत अभावाचा निक्षय होणे हा आहे. या प्रलयामध्ये एका परमात्म्याशिवाय दुसरे कांहीच राहात नाही.स्वस्वरुपस्थिति श्रीगुरूंच्या वचनावर विश्वास ठेऊन परमात्म्याचे ज्ञान करून घेऊन त्याचे स्वरूपच होऊन राहा म्हणजे असलेल्या च स्थितीमध्ये तूं समाधानाला प्राप्त होशील. त्या स्थितिमध्ये दुःख नाही. तहान भूक नाही. विवेकाविवेकही नाही. अशा स्थितीचे ज्ञान प्राप्त करून घेऊन तूं कृतार्थ होऊन राहा. कारण तें ब्रह्म तूं जाणल्यामुळे तेच तूं होऊन जाशील. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांची कृपा संपादन करून तूं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निवांत राहा असे माऊली सांगतात.


ऐशिया माजीं तो निज एकांती राहिला – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १०२९

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.